सन्मान कर्तव्याचासंपादकीय
Trending
विशेष लेख: छत्तीसगड राज्याच्या निर्मितीचा ‘मराठा’ इतिहास; नागपूरच्या भोसले घराण्याचे विसरलेले योगदान
"छत्तीसगडच्या निर्मितीचा मराठा इतिहास: बिंबाजी राजे भोसले यांनी '३६ गडांना' कसे गुंफले एका सूत्रात?"

रायपूर/नागपूर:
आज छत्तीसगड राज्य हे आपल्या घनदाट जंगलांसाठी, खनिज संपत्तीसाठी आणि निसर्गरम्य पर्यटनासाठी ओळखले जाते. परंतु, या राज्याला ‘छत्तीसगड’ हे नाव देण्यामागे आणि या मातीला प्रगत संस्कृतीची जोड देण्यामागे नागपूरकर भोसले घराण्याचा, विशेषतः महाराजा बिंबाजी राजे भोसले यांचा सिंहाचा वाटा आहे, ही गोष्ट इतिहासाच्या पानात काहीशी दुर्लक्षित राहिली आहे.
मराठ्यांचे छत्तीसगडमध्ये आगमन: ऐतिहासिक पार्श्वभूमी
आठव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा विस्तार छत्रपती शाहू महाराजांच्या काळात संपूर्ण हिंदुस्थानात झाला. यावेळी नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी बंगालपर्यंत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार केला. बंगाल मोहिमेवर जाताना मराठा सैन्याला वारंवार छत्तीसगडमधून जावे लागत असे.
त्याकाळी तिथे ‘कलचुरी’ राजघराण्याचे शासन होते, जे मुघलांच्या अधिपत्याखाली होते. मराठ्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी रघुजी राजांनी इ.स. १७४१ ते १७४५ दरम्यान आक्रमण करून कलचुरींची १००० वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आणि तिथे मराठा साम्राज्याची स्थापना केली.
बिंबाजी राजे भोसले: एका नव्या युगाची सुरुवात
१४ फेब्रुवारी १७५५ रोजी रघुजी राजांच्या निधनानंतर साम्राज्याची विभागणी झाली. रघुजींचे तिसरे पुत्र बिंबाजी राजे भोसले यांच्या वाट्याला छत्तीसगड आले. सुरुवातीला एका अनोळखी, आदिवासी बहुल आणि भिन्न संस्कृतीच्या प्रदेशाची जबाबदारी मिळाल्याने ते काहीसे निराश होते. मात्र, त्यांनी खचून न जाता या राज्याला आपले मानले.
स्थानिक लोकांमध्ये सुरुवातीला मराठ्यांविषयी भीती आणि गैरसमज होते, पण बिंबाजी राजांनी आपल्या लोककल्याणकारी धोरणांनी जनतेची मने जिंकली. त्यांनी स्वतःला केवळ एक प्रशासक न मानता जनतेचा ‘पालक’ म्हणून सिद्ध केले.
‘छत्तीसगड’ नावाचा उगम
राज्याला आज जे नाव मिळाले आहे, ते बिंबाजी राजांच्या दूरदृष्टीचे फळ आहे. त्यांनी त्यावेळच्या दोन प्रमुख रियासतींचे एकत्रीकरण केले:
* रायपूर रियासत: १८ किल्ले (गड)
* रतनपूर रियासत: १८ किल्ले (गड)
अशा प्रकारे या दोन्ही भागांतील मिळून ३६ किल्ले (गड) एकत्र आल्यामुळे या प्रदेशाला ‘छत्तीसगड’ हे नाव पडले. १७९५ मधील ब्रिटिश अधिकारी कॅप्टन ब्लॅट याच्या दस्तऐवजात आणि ‘नागपूरकर भोसले यांची बखर’ यामध्ये याचे स्पष्ट पुरावे आढळतात.
सांस्कृतिक आणि धार्मिक पुनरुज्जीवन
बिंबाजी राजांच्या काळात छत्तीसगडमध्ये मराठी आणि मोडी भाषेचा प्रसार झाला. त्यांनी केवळ राज्यविस्तार केला नाही, तर संस्कृतीही जपली:
* सण-उत्सव: विजयादशमीला आपट्याची पाने देण्याची प्रथा आणि गणेशोत्सवाची सुरुवात त्यांनी केली.
* मंदिर जीर्णोद्धार: रतनपूरमधील राम मंदिर, खंडोबा मंदिर, तुळजाभवानी मंदिर आणि रायपूरचे दुधाधारी मंदिर यांचा त्यांनी जीर्णोद्धार केला.
* न्यायव्यवस्था: रतनपूरमध्ये त्यांनी नियमित न्यायालयाची स्थापना करून प्रजेला न्याय मिळवून दिला.
छत्तीसगडचा सुवर्णकाळ
बिंबाजी राजांचा कार्यकाळ हा छत्तीसगडचा ‘सुवर्णकाळ’ मानला जातो. १७८७ मध्ये त्यांच्या निधनावेळी उपस्थित असलेला युरोपीय प्रवासी कोल ब्रुक लिहितो की, “बिंबाजी राजे इतके लोकप्रिय होते की त्यांच्या निधनामुळे संपूर्ण छत्तीसगड शोकसागरात बुडाले होते.” त्यांची समाधी आजही गरियाबंद जिल्ह्यातील नऱ्हा गावात आहे.
आजचा छत्तीसगड आणि मराठा वारसा
छत्तीसगडवर मराठ्यांनी सलग ११४ वर्षे राज्य केले. या काळात पाच मराठा राजांनी या भूमीवर राज्य केले. आजही रायपूर, बिलासपूर, कोरबा, आणि मुंगेरी यांसारख्या शहरांत लाखो मराठी भाषिक राहतात, जे या गौरवशाली इतिहासाचा जिवंत वारसा जपत आहेत.
माहिती स्त्रोत : आणि नकाशा गुगल साभार…



