ग्रामीण वार्ता
Trending
शिरूरमध्ये शंभूराजांना अभिवादन; स्वराज्य रक्षक फाउंडेशनतर्फे पाचकंदील चौकात अभिवादन सभा!
"शंभूराजांच्या बलिदानाचा इतिहास स्मरणात ठेवा"; शिरूरमध्ये बलिदान दिनानिमित्त मान्यवरांचे आवाहन..!

शिरूर (प्रतिनिधी):
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वराज्य रक्षक फाउंडेशनच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त शिरूर येथील पाचकंदील चौक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पी.एस.आय. नकाते, पी.एस.आय. दिलीप पवार, पी.एस.आय. राहुल भागवत, महिला पोलीस अधिकारी धनश्री जाधव आणि तृप्ती माकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावत शंभूराजांना मानाचा मुजरा अर्पण केला.
मान्यवरांनी जागवल्या स्मृती
कार्यक्रमात बोलताना आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्रजी सानप, लोक जागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्रजी धनक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे, ॲड. प्रदीप बारवकर व जनता दलाचे संजय बारवकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वक्त्यांनी संभाजी महाराजांच्या देदिप्यमान इतिहासावर प्रकाश टाकला. स्वराज्यासाठी त्यांनी सोसलेल्या अमानुष यातना, दिलेले बलिदान आणि धर्माप्रती असलेली त्यांची निष्ठा आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक नागरिकाने, विशेषतः तरुण पिढीने महाराजांचा इतिहास सखोलपणे समजून घेणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.





